उत्तर प्रदेशातील 2027 च्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मिल्कीपूर पोटनिवडणुकीकडे राजकीय शक्तिपरीक्षेच्या दृष्टिकोनातून पाहिले जात होते. या निवडणुकीत भाजपने विजय मिळवला असला तरी समाजवादी पक्षाने निकालांच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी या पोटनिवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, “जे लोक मरण पावले आहेत किंवा स्थलांतरित झाले आहेत, त्यांच्याही नावाने मतदान झाले आहे. अधिकाऱ्यांची नेमणूक त्यांच्या जातीनुसार केली जाणार का? हे एका मतदारसंघात करू शकतात, पण ४०३ मतदारसंघात नाही. आम्ही २०२७ च्या निवडणुकीसाठी आणखी चांगली तयारी करू.”
यादव यांच्या आरोपांमुळे भारतातील निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर नवीन वाद सुरू झाला आहे. विरोधक अनेकदा सत्ताधारी पक्षावर प्रशासनाचा गैरवापर करून निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचा आरोप करतात. यादव यांच्या वक्तव्यामुळे आगामी निवडणुकांसाठी समाजवादी पक्ष अधिक आक्रमक रणनीती आखणार असल्याचे संकेत मिळत आहेत.